पुणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल घटल्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशाच्या पात्रता गुणांमध्ये (कटऑफ) एक ते दोन टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पात्रता गुणांमध्ये घट होणार असली, तरी प्रवेशाची चुरस कायम राहण्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
गेल्यावर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच विभागांपुरती मर्यादित असलेली अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.
विद्यार्थी नोंदणी पूर्ण झाल्यावर संस्थांतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक या राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर प्रवेशाच्या चार फेऱ्या राबवल्या जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालये ११ ऑगस्टला सुरू होतील. तर, अकरावीची प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा प्रयत्न आहे.
स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, निकाल घटल्यामुळे एक ते दोन टक्क्यांनी पात्रता गुण कमी होऊ शकतात. मात्र, नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीची चुरस राहणारच आहे. यंदा राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असली, तरी पुण्यातील प्रवेशांवर त्यांचा फारसा परिणाम होणार नाही.
राज्यभरातील विद्यार्थी काही प्रमाणात दरवर्षी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतच असतात. दहावीचा निकाल वाढल्यास किंवा घटल्यास अकरावीच्या पात्रता गुणांमध्ये थोडाफार फरक पडतो असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यानुसार यंदा निकाल घटल्यामुळे पात्रता गुण एक ते दीड टक्क्याने कमी होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत इंटिग्रेडेट प्रकारच्या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळू शकते, असे फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. डी. कुंभार यांनी सांगितले.