मुंबईत देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक सुरू असताना भाजपानेही वरळीत महायुतीची बैठक घेत ‘मिशन ४८’ची तयारी सुरू केली. यावेळी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोरच मागील चार वर्षाच्या राजकीय समीकरणांवर भाष्य केलं. त्यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते शुक्रवारी (१ सप्टेंबर) वरळीत आयोजित महायुतीच्या ‘मिशन ४८’ या बैठकीत बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “माझ्या २५ वर्षांच्या राजकारणात अशी ४ वर्षे कधीच आले नाहीत. असे सुंदर ४ वर्षे आत्ता आले आहेत. पहिल्यांदा आमच्या तीन जणांचं ‘लव्ह मॅरेज’ झालं. एक जण आमच्यामधून दुसरीकडे गेले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला ‘आ जावो हमारी गाडी में बैठ जाओ’ म्हटलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर बसलो.”

“अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी दहशत आहे की…”

“आता अजित पवारांचं तिसरं इंजिन आम्हाला जोडलं गेलं. ते आल्यामुळे एकच फायदा झाला आणि तो म्हणजे ‘गद्दार, खोके’ बंद झाले. आई शपथ घरातून बाहेर निघलं की, गद्दार, खोके हेच ऐकायला मिळायचं. मात्र, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी दहशत आहे की, त्यांना एकही माणूस गद्दार म्हणत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे एक…”; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये ४८ जागा जिंकण्याची शपथ”

गुलाबराव पाटलांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी मंचावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही हसू अनावर झालं. “२०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये ४८ जागा जिंकण्याची आजची शपथ देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मित्रपक्षांच्या साक्षीने घेतली जात आहे”, असंही गुलाबराव पाटलांनी नमूद केलं.