लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आद्रतायुक्त उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ पुन्हा तापला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद शुक्रवारी अकोल्यात झाली. अकोल्याचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअवर गेले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी विदर्भात सरासरी दोन, तर राज्याच्या अन्य भागांत सरासरी १.५ अंशांनी तापमान वाढले आहे.

विदर्भात अकोला ४४.०, अमरावती ४२.८, चंद्रपूर ४३.८, वर्धा ४२.५, वाशिम ४३,६ आणि यवतमाळमध्ये ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अकोला येथे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी २.७ अंशांनी तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात शुक्रवारी कमाल पारा सरासरी ४२.५ अंशांवर राहिला. मराठवाड्यात परभणीत ४२.२ अंशांची नोद झाली. अन्य ठिकाणी सरासरी ४० अंशावर पारा राहिला. मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. त्या खालोखाल मालेगाव ४२.० आणि नगर ४० अंशांवर होते. मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ३९ ते ४० अंशांवर होते.

आणखी वाचा-बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईसह किनारपट्टीवर तापमानात काहीशी वाढ झाली आहे. डहाणूत ३६.३, अलिबाग ३४, मुंबई ३३.७ आणि सांताक्रुजमध्ये ३४.८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे गुजरातवरून येत आहे. गुजरातमध्ये तापमान सरासरी तापमान ४० अंशांवर असल्यामुळे किनारपट्टीवर आद्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे तापमानात काहीशी वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसांत पश्चिमी थंड वाऱ्याचा परिणाम दिसून येईल. दक्षिण भारतात हवेची खंडीत स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यभरात हवेत आद्रता वाढून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज, हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.