पुणे : अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्याच्या वेगात दुपटीने वाढ झाल्यामुळे बाष्पयुक्त वारे किनारपट्टी ओलांडून घाटमाथ्यापर्यंत येऊन धडकले. तसेच ‘शिअर झोन’ पुणे जिल्ह्यावरून पुढे विदर्भाकडे जात असल्यामुळे पुणे शहरासह घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, मोसमी वाऱ्याच्या वेगात दुपटीने वाढ झाली होती. अरबी समुद्रावरून येणाऱ्या आणि साधारण दोन किलोमीटर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा सरासरी वेग २० ते ३० किमी प्रती तास इतका असतो. बुधवारी रात्री या वाऱ्याचा वेग ५० किमी प्रती तासांवर गेला होता. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे किनारपट्टी ओलांडून घाटमाथ्याला धडकले. त्यामुळे घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस झाला. तसेच शिअर झोन पुणे जिल्ह्यावरून पुढे विदर्भाकडे जात आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टाही सक्रिय आहे. तसेच दक्षिण गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने किनारपट्टीवर येत आहेत. परिणामी किनारपट्टी आणि प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पावसाबाबत माहिती देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, पश्चिम घाटातील जोर पाऊस अरबी समुद्रातील मोसमी पावसाच्या शाखेमुळे पडत आहे. तसाच विदर्भातील पाऊस बंगालच्या उपसागतील मोसमी पावसाच्या शाखेमुळे पडत आहे. साधारणपणे झारखंड आणि बंगालच्या उपसागरादरम्यान हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचे रुपांतर वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत झाले आहे. ही चक्रीय स्थिती झारखंडवर आहे. त्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्री चंद्रपूर आणि गडचिरोलीत पडलेला पाऊस या चक्रीय स्थितीमुळेच पडला आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पश्चिम घाटमाथ्यावर अतिमुसळधार; ताम्हिणीत तब्बल ५५६, भिरा ४०१, लोणावळ्यात ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी रात्रभर आणि गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर होता. त्या तुलनेत शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. पण, किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.

एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग