लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासातून वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची दाट शक्यता आहे. तरुणांच्या मनात ही भावना रुजणे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने या अभ्यासक्रमाबाबत विचार करणे आवश्यक असून, हा विषय राज्य शासनाच्या अंतर्गत नसला तरी राज्य शासनाने त्याबाबतची स्पष्ट भूमिका सीबीएसईला कळविली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे रविवारी व्यक्त केले.

सरहद संस्थेच्या धनकवडी येथील ‘सरहद पब्लिक स्कूल’च्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेस वाडेकर, अनुज नहार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संत सिंग मोखा, शैलेश पगारिया यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले, ‘याला विकास म्हणत नाहीत…’

देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबरोबरच फाळणीचा इतिहास शिकविण्यात यावा, असे परिपत्रक सीबीएसईने काढले आहे. त्यासंदर्भात पवार यांनी यामुळे देशात कटुता निर्माण होईल, असे सांगितले.

ते म्हणाले की, देशासमोर असलेल्या प्रश्नांबद्दल तरूणाईच्या मनात आस्थान, संवेदना निर्माण करायची असेल तर अभ्यासक्रमातून हिंसा आणि कटुतेऐवजी वेदना आणि दु:ख पोहोचविले पाहिजे. देशासमोरचे प्रश्न सोडविण्यासाठी नवी पिढी वैचारिकदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक आहे. मात्र कटुता निर्माण करणे अभ्यासक्रमाचा पुन्हा विचार करावा लागेल. राज्यातील अनेक शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकविला जातो. फाळणीच्या वेळी रक्तरंजित इतिहास घडला. हिंदू-मुस्लिम दंगलीचा त्याला इतिहास आहे. त्यामुळे हा विषय अभ्यासक्रमात नको. त्यामुळे राज्य शासनाने याबाबतची स्पष्ट भूमिका सीबीएसईला कळविणे आवश्यक आहे.

आणखी वाचा- “मला खात्री आहे…”, अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य

‘देशातल्या कमकुवत प्रांतामधील मुलांना पुण्यात आणून शिक्षणाच्या माध्यमातून उभारी देण्याचा मार्ग सरहदने स्वीकारला आहे. शिक्षणाच्या माध्मयातून अनेकांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम सरहद संस्था करत आहे,’ असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की जगाच्या पाठीवर उदयास आलेल्याअनेक संस्कृती, परंपरा लोप पावल्या. मात्र भारतीय परंपरा आणि संस्कृती अजून टिकून आहे. समस्या सोडविण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना पक्षभेद विसरून मदत करण्याची भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशाला कोणीही संपवू शकत नाही.