पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, पुण्यातही सात रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

राज्यात १ मार्च ते ५ मे या कालावधीत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २३ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल बुलडाणा २१, जालना धुळे प्रत्येकी २०, सोलापूर १८ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा : Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi

राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

उष्माघातामुळे होणारा त्रास

मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सिअस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा : कांद्याची निर्यात सुरू; तरीही दरात पडझड

सर्वाधिक रुग्णसंख्या

  • नाशिक – २३
  • बुलडाणा – २१
  • जालना – २०
  • धुळे – २०
  • सोलापूर – १८
  • सिंधुदुर्ग – १०