पिंपरी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातून लाखो वैष्णवांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. वैष्णवांच्या उपस्थितीने अलंकापुरी फुलली आहे. ‘ज्ञानोबा, तुकोबा’चा जयघोष आणि पारायणाने आळंदीतील वातावरण भक्तिमय झाले आहे.

कार्तिकी वारीतील मुख्य एकादशी सोहळा उद्या (मंगळवारी) तर, माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा गुरुवारी (२८ नोव्हेंबर) संपन्न होणार आहे. यानिमित्त वारकरी मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवसभर आळंदीत हरिनामाचा जागर, भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू आहेत. माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी ओसंडून वाहत आहे. भाविकांना महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग ठेवला आहे. दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पलीकडे जात आहे. दर्शनासाठी पासधारक, जागरचे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार यांना हरिहरेंद्र स्वामी मठाजवळील जिन्याने प्रवेश दिला जात आहे. चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी महाद्वारातून केवळ इंद्रायणीकडे जाणाऱ्यांसाठी एकेरी पद्धतीने रस्ता खुला आहे. इंद्रायणीकडून शनिमंदिरमार्गे येणाऱ्यांसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : हवाई प्रवाशांना खूषखबर! पुणे विमानतळावरून आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारकऱ्यांच्या दिंड्यांनी राहुट्या उभारल्या आहेत. शेजारीच मंडप टाकून ज्ञानेश्वरी सप्ताह, कीर्तन, भजन सुरू आहे. राहुट्यांमध्ये कोणी विश्रांती घेत आहे, तर राहुट्यांशेजारी वारकरी भाविकांच्या भोजनव्यवस्थेसाठी तयारी करताना दिसत आहेत. माउली मंदिर, विश्रांत वड, सिद्धबेट येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कडाक्याची थंडी पडली असताना देखील अगदी भल्या पहाटेपासून भाविक भक्त इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान करून दर्शनासाठी जात आहेत. टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानोबा, तुकोबा’चा जयघोष, ठिकठिकाणी सुरू असलेले हरिपाठ, प्रवचन, कीर्तन यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. वारकरी साहित्याची दुकाने सजली आहेत. वारकरी, भाविक गीता, भागवत पुराण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, तुकारामांची गाथा अशा विविध ग्रंथांची खरेदी करताना दिसून येत आहेत.