पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी संतततधार पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने पावसाळ्याच्या हंगामातील पहिला विसर्ग गुरुवारी नदीपात्रात करण्यात आला. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून प्रथम पाणी सोडण्यात आल्यानंतर विसर्गाचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढविण्यात येऊन रात्री साडेनऊ वाजता पंधरा हजार क्युसेक वेगाने पाणीनदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे नदीला पूर आला. दरम्यान, चारही धरणांमध्ये मिळून ८.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक होता. मात्र, बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी दुपारी एक वाजता सांडव्यावरून मुठा नदीपात्रात १ हजार ९२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ४ हजार ३४५ क्युकेस, ८ हजार ७३४ क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला. तर, रात्री साडेनऊ वाजता विसर्ग १५ हजार क्युसेक एवढा करण्यात आला.
दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने नदीपात्रालगतच्या सोसायट्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर रात्रीही कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढविण्याची शक्यता आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आज, शुक्रवारी पुण्यात आगमन होणार आहे. सध्या नदीला पूर आल्याने वारकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा आणि पाऊस
टेमघर : ०.४ टीएमसी ९० मिलिमीटर
वरसगाव : ४.१६ टीएमसी ११३ मिलिमीटर
पानशेत : २.४६ टीएमसी ११६ मिलिमीटर
खडकवासला : १.६६ टीएमसी ७३ मिलिमीटर
पुणेकरांना दिलासा
चारही धरणांमध्ये एकूण ८.६८ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ३.६३ टीएमसी एवढा होता. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा जास्त आहे. दरवर्षी पालखी सोहळ्या निमित्त नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. यावेळी मात्र विसर्ग सुरू झाला आहे.