पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांवर मनस्वी प्रेम हाच गो. नी. दांडेकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील स्नेहाचा समान धागा होता. हे दुर्गांवरचे प्रेम त्यांच्या लेखनातही प्रतिबिंबित झाले’, अशा आठवणींना उजाळा देत इतिहास प्रेमी रविवारच्या सायंकाळी रंगून गेले.

गोनीदांचा स्मृतिदिन हा इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने दुर्गदिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित ‘आठवणीतील आप्पा-बाबा’ या कार्यक्रमात दुर्गअभ्यासक डाॅ. मिलिंद पराडकर यांनी गोनीदा आणि ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डाॅ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुर्गभ्रमंतीच्या आठवणींचा पट उलगडला. इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. १३० पेक्षा अधिक गड किल्ल्य़ांवर जाणाऱ्या आणि गडकिल्ल्यांचा इतिहास अगदी लहान वयात समजून घेण्यासाठी धडपडणाऱ्या शर्विका म्हात्रे हिचा सत्कार या वेळी करण्यात आला.

पराडकर म्हणाले, ‘दुर्गांवर राहणाऱ्या माणसांविषयी गोनीदांनी केलेल्या लेखनाला तोड नाही. स्वतःचे मोठेपण विसरून ते त्यांच्यामध्ये सहजपणे मिसळून जात असत. गडावर राहणाऱ्या माणसांना स्वयंपाक करण्यात मदत करण्यापासून ते त्यांना आग्रहाने जेवू घालण्यातून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. किल्ल्यांशी, शिवछत्रपती यांच्याशी ते भावनिकरित्या जोडले गेले होते.’

देशपांडे म्हणाले, ‘दांडेकर आणि पुरंदरे यांना इतिहास आणि शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी, जिव्हाळा होता. या दोघांनी आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी त्यांची हयात खर्च करून इतिहास वर्तमान काळात आणून ठेवला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.