पुणे : पश्चिम महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांतील १४४ गावे दरडप्रवण भागांत असून पाच जिल्ह्यांत ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दरडप्रवण गावे आहेत. त्यातही सर्वाधिक ७६ दरडप्रवण गावे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात एकही दरडप्रवण गाव नसल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेनंतर दरडप्रवण गावांचा विषय ऐरणीवर आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ११ तालुक्यांत ७६ दरडप्रवण गावे आहेत. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यात ४१ गावे, पुणे जिल्ह्यात २३, सांगलीत चार गावे दरडप्रवण भागात आहेत. दरडप्रवण भागातील केवळ ११ गावांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविला असून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यापैकी सातारा गावातील सात अतिधोकादायक गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात आले आहे. प्रस्ताव प्रलंबित असलेल्या गावांमधील स्थानिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वेक्षणानुसार कृष्णा, वारणा, इंद्रायणी, कोयना, निरा आदी प्रमुख नद्यांसह उजनीच्या क्षेत्रातील अनेक परिसर, छोटय़ा मोठय़ा नद्यांवरील ५९४ गावे पूरप्रवण आहेत. अनेक ठिकाणी नदीपात्रालगत अतिक्रमण झाले आहे. नद्यांचे प्रवाह अडवून बांधकामे किंवा विकासकामे करण्यात आल्याचे सर्वेक्षणात आढळले. त्यामुळे गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.