देशात सगळीकडेच आता आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था सुरू केल्या जात आहेत. मात्र, केवळ शैक्षणिक संस्था सुरू करून उपयोग नाही, तर त्यांच्या गुणवत्तेवरही भर देणे आवश्यक आहे. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्राध्यापक नाहीत या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे, संस्थांना दिला जाणारा निधी अतिशय तुटपुंजा आहे, अशी टीका राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी मंगळवारी केली.
विश्वकर्मा पुस्तक प्रकाशनातर्फे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान : अपेक्षा आणि वास्तव’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल लचके, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. आदित्य अभ्यंकर, विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा- पुणे: देशात तंत्रज्ञान विकासावर खर्च कमी; ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे मत
भारतात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांना महत्त्व देण्यात आले. याच विषयांशी निगडीत संस्थांची स्थापना करण्यात आली. मात्र, त्याचवेळी मानवशास्त्राकडे आपण दुर्लक्ष केले. त्याचीच आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे. केवळ संस्था काढून चालणार नाही तर त्याची गुणवत्ता आपण तपासायला हवी, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. आजकाल कोणत्याही गोष्टी विज्ञान म्हणून शिकवल्या जात आहेत. ज्योतिष विज्ञान म्हणून शिकवण्यापर्यंत विज्ञानाची चेष्टा चालवली आहे. आजही या सरकारला वैज्ञानिक संस्था विकसित करण्याऐवजी मंदिर निर्माण महत्त्वाचे वाटत असल्याचे देशमुख म्हणाले.