पुणे : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपचे नगरसेवक निवडून आलेल्या १०५ जागा सोडून अन्य जागांवर चर्चा करण्याची भूमिका शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढल्यास त्याला पुणे ‘अपवाद’ ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चार महिन्यांत घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी मुक्कामी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची कामगिरी, निवडणुकीसंदर्भातील पक्षाची तयारी यासंदर्भात फडणवीस यांनी आढावा घेतला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

निवडून आलेल्या १०५ जागा सोडून अन्य जागांवर चर्चा करावी, अशी भूमिका घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका बैठकीत मांडली.‘राज्यात सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात, असा प्रयत्न आहे. मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीनंतर पुणे महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याने स्वबळाच्या चाचपणीला आणखीनच जोर मिळाला आहे.

मुंबईपाठोपाठ पुणे ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महापालिका आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचे शंभर नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे) पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपने एकूण १०५ जागांवर दावा केला आहे. या जागा सोडून अन्य जागांबाबत बोलणी करावी, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अप्रत्यक्ष सहमती दर्शविली आहे.

शहर आणि जिल्ह्याचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला २१ पैकी १९ जागांवर विजय मिळविता आला आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. महायुती म्हणून महापालिकेची निवडणूक लढवायची झाल्यास अनेक इच्छुक असल्याने बंडखोरी होण्याचीही भीती आहे. त्यामुळे निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वबळावर लढविण्यात यावी, अशी भूमिका काही भाजप पदाधिकाऱ्यांची आहे.

शहरात भाजपचे सहा आमदार, त्यांपैकी एक राज्य मंत्रिमंडळात मंत्री, दोन खासदारांपैकी एक केंद्रीय राज्यमंत्री, एक माजी खासदार असे बळ आहे. त्यामुळे पुणे भाजपसाठी महत्त्वाचे शहर ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचेही पुण्याकडे सातत्याने लक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्यासाठी पुणे महापालिकेतील सत्ताही महत्त्वाची ठरणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढविण्याच्या मर्यादा लक्षात घेता निवडणुकीनंतर काही जागा कमी पडल्यास महायुतीमधील मित्रपक्षांना बरोबर घेता येईल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीत चारचा प्रभाग?

आगामी निवडणूक सन २०१७ च्या चार नगरसेवकांचा प्रभाग या पद्धतीनेच होणार असल्याचे संकेत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. चार नगरसेवकांचा एक प्रभाग यानुसारच तयारी करण्याची सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली असल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. शहरात भाजपच्या १०५ जागा आहेत. त्या सर्व लढवल्या जातील. निवडणूक स्वबळावर की महायुती म्हणून लढवायची, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप