राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय. राज ठाकरे देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, असा खोचक टोला जयंत पाटलांनी विचारला. मनसेकडून कसबा मतदारसंघात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यात मुस्लीम बांधवांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलीय. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील पुण्यात बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “हनुमान चालिसा हनुमान जयंतीलाच झाली पाहिजे. राज ठाकरे परवा येऊन काय उपयोग आहे? तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत. रोजही हनुमान चालिसा होते. माझ्या मतदारसंघात माझ्या निवडणुकीआधी माझे कार्यकर्ते सर्व हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालिसा करतात. त्याचं आम्ही प्रदर्शन करत नाहीत, लोकांना दाखवत नाही. त्याचं प्रदर्शन करायचं नसतं.”

“शिवाजी महाराजांनी आम्हाला दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं शिकवलेलं नाही”

“प्रत्येकाची श्रद्धा, भक्ती ज्याच्यावर आहे त्याच्यावर राहतेच. आम्ही हनुमानाचेही भक्त आहोत, रामाचेही भक्त आहोत. आमच्यामधील हिंदुत्वाचा भाव तो आहेच. याचा अर्थ दुसऱ्या धर्मांचा द्वेष करणं नाही. शाहु, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं शिकवलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात खूप मोठे लढवय्ये मुस्लीम समाजाचे आणि बारा बलुतेदार होते. ते सर्व छत्रपतींना साध देणारे होते,” असं जयंत पाटील सांगितलं.

हेही वाचा : “दादा हिमालयात जाणार असतील तर मीही…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांना मागील ३० वर्षे हनुमान चालिसा का आठवली नाही?”

“महाराष्ट्रात जो प्रकार सुरू आहे. त्यांना मागील ३० वर्षे हनुमान चालिसा आठवली नाही, आत्ताच हनुमान चालिसा का आठवली? भाजपा जे सांगतं तो अजेंडा ते राबवत आहेत. यांनी हनुमान चालिसावरून दोन धर्मात द्वेष निर्माण करायचा आणि तिकडून औवेसींनी मुद्दा उचलायचा ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. हे सर्व भाजपा करतंय. म्हणून महाराष्ट्रात कोठेही दंगली होऊ नये जातीय तणाव निर्माण करू नये याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे,” असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.