जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील श्रीराम ढाब्याजवळ झालेला अपघात हा मोटारीच्या अतिवेगामुळे झाल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. वेगाने चाललेल्या मोटारीची टेम्पोला धडक बसल्याने नऊ जणांचा बळी गेला. मृत मोटारचालकाविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण भारत राऊत (वय २७, रा. पवारवाडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ रामचंद्र वायसे यांचा मुलगा प्रनिकेत सोमनाथ वायसे याने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या अपघातात सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवनी यादव, ( दोघे रा. नाझरे, पुरंदर) अजय कुमार चव्हाण (उत्तर प्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर) अश्विनी संतोष एस. आर. (रा. सोलापूर), किसनलाल (रा. बिकानेर, राजस्थान) सार्थक किरण राऊत, किरण भारत राऊत, अक्षय संजय राऊत (रा. पवारवाडी इंदापूर) यांचा मृत्यू झाला.

किर्लोस्कर कंपनी जवळ असलेल्या श्रीराम ढाब्यावर टेम्पोतील फ्रीज उतरवून घेण्याचे काम सुरू असताना वेगाने आलेल्या मोटारीची टेम्पोला जोरदार धडक बसली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी रात्री अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी आवश्यक ती मदत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतिरोधक बसविण्याची मागणी

जेजुरी आणि मोरगाव ही तीर्थक्षेत्रे असल्याने जेजुरीत खंडोबा यात्रा करण्यासाठी आलेले भाविक मोरगावला मोठ्या संख्येने जात असतात. त्याचप्रमाणे बारामती, तुळजापूरला येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जेजुरी रेल्वे स्थानकाच्या उड्डाणपुलापासून मावडीपर्यंत गतिरोधक नसल्याने वाहनचालक वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.