पुणे: ‘सर्व धर्मांत प्राणी आणि पशुहत्या निषेधार्ह मानली आहे. उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी, त्यामुळे होणारे प्रदूषण, त्यातून पसरणारी रोगराई करोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करावी,’ अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. गंगवाल म्हणाले, ‘बकरी ईद अहिंसक आणि पर्यावरणपूरक व्हावी. कुराणातही हत्येचा निषेध केला आहे, त्यामुळे बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नये. पिठाची प्रतीकात्मक बकरी किंवा बकरीच्या प्रतिमेचा उपयोग करून ही ईद साजरी करावी. मुस्लिम बांधवांनी यंदाच्या बकरी ईदला पशुबळी देण्यापासून दूर राहावे. कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.’
‘हिंदू धर्मातही पशुहत्येला स्थान नाही. धर्माच्या नावाखाली देवी-देवतांसमोर कोणताही पशुबळी देऊ नये. या विरोधात केंद्र सरकारने कायदा करावा,’ अशी मागणी गंगवाल यांनी केली. ‘आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश येथे प्रतिबंध करणारा कायदा आहे. या राज्यांत कायदा होत असेल, तर देशात का होऊ शकत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कठोर कायदा आणावा. भगवान महावीरांनी दिलेली ‘अहिंसा परमो धर्म:’ ही शिकवण, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी वेळीच योग्य पावले उचलण्याची गरज आहे,’ असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.