पुणे : भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापकांची ९०३ रिक्त पदांसाठी ३७ हजार १५२ अर्ज दाखल झाले आहेत. या पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे.
भूकरमापकांची ९०३ रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत संपुष्टात आली आहे. या कालावधीत हे अर्ज आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली. या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे विभागातून ३ हजार ९०७, कोकण विभागातून ९ हजार ७९४, नाशिक विभागातून ५ हजार ३२७, संभाजीनगर ९ हजार ९४२, अमरावती ४ हजार ३४७ तर, नागपूर विभागातून ३ हजार ८३५ अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९०३ पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभागातील २५९, नाशिक विभागातील १२४, छत्रपती संभाजीनगर विभागातील २१०, अमरावती विभागातील ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी येत्या १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी राज्य शासनाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून, विभागनिहाय अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.
