पुणे : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर स्थापन करण्यात आलेली मराठी भाषा संवर्धन समिती कागदावरच राहिली आहे. मराठी भाषा संवर्धन समितीला सद्यस्थितीत पूर्ण वेळ कार्यालय नसल्याने साहित्यिक उपक्रमांना गती मिळत नसल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली मनसे नेते बाबू वागसकर, शहर सचिव रमेश जाधव, रवी सहाणे यावेळी उपस्थित होते. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्याचे साईनाथ बाबर यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे: सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचा वावर; मोरदरवाडीतील ग्रामस्थ भयभीत

हेही वाचा – ‘कसबा’ समस्यांनी ग्रासला, भाजपाने तयार केली समस्यांची यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसाराबरोबरच भाषा संवर्धन आणि विकासासाठी मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना २०१२ साली करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटका या समितीला बसला आहे. समितीला पूर्णवेळ कार्यालय नाही. त्यामुळे समितीसाठी स्वतंत्र कार्यालय आणि अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. समितीमार्फत देण्यात येणारे साहित्य पुरस्कार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडले आहेत. साहित्यिक कट्ट्यावरील साहित्यिक कार्यक्रमात निमंत्रित पाहुण्यांना पाचशे रुपये मानधन दिले जाते. साहित्यिक कट्ट्यावरील समन्वयक कवी, लेखकांना समितीच्या बैठकीला निमंत्रित केले जात नाही. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संपर्कदूत म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.