पुणे : ‘नाट्यगृहाची दिलेली तारीख काढून घेतली जाऊ नये. नाटकाच्या प्रयोगाचे २० दिवस आधीपासून बुकिंग होत असते. नाटक सादर करण्याची कलाकारांची आणि पाहण्याची प्रेक्षकांची तयारी झालेली असते. कोणीही विनंती केली, तरी नाटकाच्या प्रयोगाची दिलेली तारीख काढून घेता कामा नये,’ अशी एकमुखी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवारच्या वतीने आयोजित महोत्सवात ‘नाटकावर बोलू काही’ या विषयावर प्रशांत दामले, विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला.
‘कोणीही विनंती केली, तरी माझ्या नाटकासाठी दिलेली तारीख रद्द करणार नाही. हे विधान मी कलाकार, निर्माता आणि नाट्य परिषदेचा अध्यक्ष अशा तिहेरी भूमिकेतून करतो आहे,’ असे दामले यांनी सांगितले. ‘नाटकाच्या तारखा या प्रामुख्याने राजकीय कार्यक्रमांसाठी काढून घेतल्या जातात. राजकीय कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर कशाला हवे? ते गणेश कला क्रीडा मंच येथेही होऊ शकतात की, ज्यामध्ये अधिक लोकांना सामावून घेता येऊ शकते’, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
केंकरे म्हणाले, ‘करोनानंतरच्या कालखंडात मनोरंजनाची माध्यमे वाढली असली, तरी वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या नाटकांना प्रेक्षकांनी स्वीकारले. रंगभूमीच्या इतिहासात विनोदी नाटकांपेक्षा गंभीर नाटके अधिक टिकली आहेत.’
दामले म्हणाले, ‘विनोदी कलाकार म्हणून शिक्का असला तरी मी गंभीर भूमिका केल्या आहेत. कलाकार म्हणून जोखीम पत्करायला तयार आहे. पण, माझ्यातील निर्माता ते धाडस करायला धजावत नाही. टिकलेली नाटके वेगळी आणि चाललेली नाटके वेगळी एवढेच मला सांगायचे आहे.’ कुलकर्णी म्हणाले, ‘नाटक पाहण्यासाठी वेळ काढावा लागतो, नाट्यगृहात जावे लागते. तरुण प्रेक्षक कायम राहिला. ही अशी गंभीर कला आहे की, जिथे प्रेक्षक स्वतःवर अंधार करून घेतात.’
‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ लीला गांधी यांना प्रदान
‘पुण्याचे वैभव असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पद्म’ मिळण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे शिफारस करण्यासाठी पुढाकार घेऊ,’ अशी ग्वाही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिली.
मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मोहोळ बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डाॅ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नाट्य परिषदेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, ऑर्गनवादक जयराम पोतदार, छायाचित्रकार अक्षय परांजपे, पत्रकार कल्याणी फडके यांना सन्मानित करण्यात आले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चित्रसेन भवार यांनी आभार मानले.