रात्रीच्या वेळी दुचाकी जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे बुधवारी उघड झाले. पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील दुचाक्या व चारचाकी मोटारी जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला. त्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळी दुचाकी जाळण्याचे प्रकार यापूर्वीपासून होत आहेत. गेले काही महिने हे प्रकार थांबले होते. मात्र, संत तुकारामनगरमध्ये पुन्हा तसाच प्रकार घडल्याने हा ‘उद्योग’ कायम असल्याचे दिसून आले. रात्री साडेबाराच्या सुमारास गाडय़ा जळत असल्याचे दोन तरुणांनी पाहिले. संबंधित गाडीमालकांना त्यांनी हा प्रकार कळवला. त्यांनी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून हा प्रकार सांगितला. तेव्हा थोडय़ाच वेळात पोलीस घटनास्थळी आले. जळणाऱ्या गाडय़ा व आजूबाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्या त्यांच्या निदर्शनास आल्या. दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. बाहेरून लोक येतात, दारू पिऊन िधगाणा घालतात, याबाबतची तक्रार लोकप्रतिनिधींकडे तसेच पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नसल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला.