पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे. उमेदवारी देणारे दिल्लीत ‘मागणारे’ झाले आहेत. त्यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत, अशा शब्दात शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात सोमवारी झाली. त्यावेळी डाॅ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. हडपसर विधानसभा मतदारसंघातून कोल्हे यांना मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी राज्यामंत्री बाळासाहेब शिवरकर, ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>निवडुंगापासून रस, पशुखाद्य, नैसर्गिक चामडे; प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसरच्या आमदाराला शिवसेनेने मदत केली. त्यामुळे ते निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ते सर्व विसरले, अशी टीका ठाकरे गटाचे संजय मोरे यांनी केली.अर्थसंकल्प आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी हडपसरच्या आमदारांची होती. मात्र त्यांनी भूमिका बदलली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. मात्र समन्वयासाठी नव्याने समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे प्रशांत जगताप यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेतर संविधान बदलले जाईल. त्यामुळे हा डाव यशस्वी होऊ देता कामा नये, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.