एका मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाने त्याच्या मित्राचा व आईचा नरबळी दिल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी त्या तरुणाचा रविवारी रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले.
दुर्गाबाई राजू जगताप (वय ५०) आणि धनंजय राजू जगताप (वय २२, रा. दोघेही-बतुल आळी, चाकण) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या गळा कापून बळी दिल्याच्या आरोपावरून सुनील बबन पाचंगे (वय २८, रा. पाचंगे चाळ, दापोडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सुरेश हरिभाऊ शेटे (वय ३५, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय हा बीकॉम केल्यानंतर नोकरीच्या शोधात होता. आरोपी सुनीलचा मामा हा चाकण येथे असल्यामुळे त्यांची मैत्री झाली होती. धनंजयचे वडील वीस वर्षांपूर्वीच वारले आहेत. त्यामुळे तो आणि त्याची आई दुर्गाबाई राहत होते. मात्र, धनंजयला त्याच्या आईच्या चारित्र्यावर संशय होता. आईचे वागणे बरोबर नसल्यामुळे त्याने सुनीलला त्याच्या आईला मारायचे असल्याचे सांगितले. त्या दोघांनी लोणावळ्याच्या घाटात त्यांना मारण्याची योजना आखली. त्याचे प्रात्याक्षिक करण्यासाठी १८ एप्रिलला तिघेही लोणावळ्याच्या घाटात गेले. दुर्गाबाईना लांब ठेवून दोघे एका ठिकाणी गेले. त्यांना कसे मारायचे हे दाखविण्यासाठी सुनीलने धनंजयचे हात बांधून घाटात उभे केले. त्याच्याच डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला.
 धनंजयला नोकरी लागली असल्याचे सुनीलने दुर्गाबाईंना सांगितले. ते दोघेच चाकणला परत आले. त्यानंतर २० एप्रिल रोजी देवदर्शनाला म्हणून सुनीलने त्यांना चाकणजवळील साबळेवाडी येथे नेले. त्यांचा गळा कापून खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह चाकण-शिक्रापूर रस्त्यालगतच्या एका विहिरीत टाकून दिला. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असता धनंजयनेच त्यांना खून करून गायब झाल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, नंतर धनंजयचा मृतदेह सापडल्यामुळे तपास सुरू झाला. धनंजयचा मित्र सुनील असल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता संशय बळावला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानेच दोघांचा खून केल्याचे सांगितले.
 याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सुनील याने त्याला एका मांत्रिक पैशाचा पाऊस पाडायचा असेल, तर तुला अष्टमी आणि दशमीला नरबळी द्यावा लागेल, असे सांगितले होते. गळा कापून खून करण्याअगोदर अकरा वेळा मंत्र म्हणण्याचे मांत्रिकाने सांगितले होते. त्यानुसार त्याने दोघांचा खून केल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याला मांत्रिकाचे नाव माहिती नसल्याचे सांगत आहे, असे चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले.