पुणे : ‘कोणतीही शहानिशा न करता महापालिका अधिकाऱ्यांनी बासी ईदला सारसबाग बंद ठेवली. पण, असे करताना आपण एका विशिष्ट समुदायाचे नागरी अधिकार नाकारतो आहे, त्यांचा अपमान करतो आहे आणि एका अर्थाने अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला पुन्हा जन्माला घालतो आहे, हे ध्यानीमनी येत नाही याचे आश्चर्य वाटते,’ अशा शब्दांत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने सोमवारी टीका केली.
मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे भूमिका मांडली. ‘मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या रमजान ईद आणि बकरी ईद सणाच्या काळात महिलावर्गाला स्वच्छता, स्वयंपाक करताना खूप परिश्रम पडतात. त्यातून विश्रांती आणि आनंद मिळवण्यासाठी त्या जवळपासचे बगीचे, चित्रपटगृह किंवा करमणुकीच्या ठिकाणी जातात. यापासून त्यांना वंचित करण्यासाठी आणि बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिमांनी बागेत जाऊ नये म्हणून सारसबाग बंद ठेवण्यात आली. त्यास खासदारांचे आक्षेपार्ह पत्र निमित्त ठरले,’ असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘वास्तविक शिस्त मोडणाऱ्यांविरोधात कायदे अस्तित्वात आहेतच. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा निर्माण करता येणे शक्य आहे. मांसाहारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असेल, तर तेथे मांसाहाराला बंदी घालावी, कोणत्याही समुदायाच्या माणसांना नाही. सर्वसामान्य मुस्लिम समाजाविरोधात संशय, द्वेष, शत्रुभाव निर्माण करणारे असे पत्रक काढणे आणि वर्तन करणे, हे या समाजाचे राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारणारे आहे,’ असे तांबोळी यांनी या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
नेमके प्रकरण काय?
‘सारसबागेमध्ये बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून डब्यातून आणलेल्या सामिष भोजनाचा आस्वाद घेत असल्याने पेशवेकालीन सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य भंग पावत असल्याची हिंदू संघटनांची तक्रार आहे. याविरोधात हिंदू संघटनांनी रविवारी सामाजिक एकत्रीकरणाचा कार्यक्रम ठरविल्याने दोन्ही समाज समोरासमोर येऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सारसबागेतील उद्यान रविवारी बंद ठेवून, मंदिरामध्ये भाविकांना दर्शन घेण्याची मुभा दिली, तर सार्वजनिक शांततेचे पालन होईल,’ अशा मागणीचे पत्र राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे दिले होते. त्यानुसार रविवारी सारसबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. सवाई माधवराव पेशवे उत्तरद्वार बंद ठेवून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘खासदारांच्या पत्रानंतर स्थानिक पोलीस अधिकारी आणि उद्यान विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये रविवारी सारसबाग उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्पष्ट केले होते.