पुणे : ‘मी राजकारण करत नाही आणि लोकांनाही सांगतो की, राजकारण करू नका. चांगले काम केले, की लोक आपोआप मत देतात. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम हीच सगळ्यात मोठी पूंजी असते. राजकीय नेत्यांनी हे समजून घेत ‘शॉर्ट कट’ टाळायला हवेत,’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

‘माईर्स एमआयटी’च्या ‘श्री सरस्वती कराड रुग्णालया’चे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘माईर्स एमआयटी’चे डॉ. विश्वनाथ कराड, विश्वस्त पी. बी. जोशी, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, डॉ. मंगेश कराड, उषा कराड, ह. भ. प. तुळशीराम कराड, डॉ. वीरेंद्र घैसास या वेळी उपस्थित होते.

‘आपल्या देशात विचारभिन्नता नाही तर विचारशून्यता ही खरी समस्या आहे.‘ अशी टिप्पणी गडकरी यांनी केली.‘आजही औषध विकत न घेऊ शकणारे लाखो लोक या देशात आहेत. इतकी वाईट स्थिती आहे की, गरीब माणसाला कोणी वाली राहिलेला नाही. सध्या सामाजिक संवेदनशीलता आणि जाणीव जागी ठेवून मोठे काम उभारण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे गडकरी म्हणाले.

‘प्रत्येक माणसाला राहायला घर, प्रत्येक गावात रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी, मुलांकरिता चांगली शाळा आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव पाहिजे. केवळ ‘स्मार्ट सिटी’च नाही, तर गावेही स्मार्ट व्हावीत. समाजाने समाजासाठी चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटनांनी सरकारसोबत काम करायला हवे,’ अशी अपेक्षा व्यक्त करून गडकरी म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या माध्यमातून एक हजार घरांचे स्मार्ट गाव निर्माण करण्यात येत आहे. त्यात ५ लाख रुपयांमध्ये घर आणि मोफत वीज, पाणी देण्यात येणार आहे.’

डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सुचेत्रा कराड आणि डॉ. घैसास यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. वैशाली कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्यालाही आरोग्य सेवा द्या’

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नागपूरला, विदर्भाला लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आरोग्य सेवा मिळाल्या आहेत. आता त्यांनी त्याच पद्धतीने वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यालाही आरोग्य सेवा द्याव्यात,’ अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी केली.