पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बससेवा; तसेच एखाद्या गावातून समूहाने आरक्षण (ग्रुप बुकिंग) केल्यास त्या गावातील आगारापासून थेट पंढरपूरपर्यंतची बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. समूह आरक्षणासाठी कमीत कमी ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविक असणे आवश्यक आहे. संबंधित भाविकांना त्यांच्या गावातील आगारापासून थेट पंढरपूरपर्यंत गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील ‘एसटी’ महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित आणि वेळेत पंढरपूर वारीसाठी जाता येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
ज्येष्ठ, महिलांना सवलत लागू
एसटी महामंडळाकडून ६५ वर्षांपुढील प्रवासी आणि महिलांसाठी ५० टक्के सवलत, तसेच ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. समूह आरक्षण करून बससेवा घेतली असल्यास संबंधितांना ही सुविधा लागू असणार आहे, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आषाढी वारीनिमित्त पुणे ते पंढरपूर विशेष ‘एसटी’ सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा समूहाने आगाऊ आरक्षण केल्यास संबंधित ठिकाणाच्या आगारातून पंढरपूरपर्यंत स्वतंत्र एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष एसटीच्या नियोजित फेऱ्या आणि आगाऊ आरक्षणाच्या मागणीनुसार ‘एसटी’ गाड्या उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत नियोजन करून वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महांमडळ, पुणे