पुणे : पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी वर्षाविहार करताना अनेक धोक्यांपासून सावध राहून भटकंती करणे आवश्यक असतानाही, त्याचे पालन होत नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील लोणावळा, तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले आणि स्मारके, धरण आणि अन्य पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार धरण,धबधबे, नद्यांच्या जलाशयात उतरण्यास मनाई करण्यात आली असून, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिलेले हे आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. पाऊस सुरू झाला, की सह्याद्रीतील डोंगररांगा हिरवाईने नटण्यास सुरुवात होते. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहण्यास सुरुवात होते आणि निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी, वर्षाविहारासाठी पर्यटकांची विविध पर्यटनस्थळी गर्दी होते. मात्र, पावसाळी भटकंती करताना ती काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटा, दाट धुके, घाटमाथ्यावरील पावसामुळे जलस्रोतांना आलेला पूर, गड-किल्ल्यांवरील तटबंदीचे दगड निसटून दरड कोसळण्याची भीती अशा अनेक धोक्यांपासून सावध राहणे आवश्यक असते. मात्र, त्याचे पालन न करता धबधबे, पाणथळ जागांवर गर्दी केली जाते. त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पावसाळ्यात ट्रेकिंग करताना किंवा वर्षाविहाराला जाताना कोणती काळजी घ्यावी, असे आवाहनही विविध संस्थांनी केले आहे.
गर्दी होणारी ठिकाणे
लोणावळा परिसरातील भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, तसेच एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते.
निर्बंध कोणते?
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे आणि पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक बनलेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे,धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी, तसेच कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्यविक्री करण्याबरोबरच उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीच्या रस्त्यात, तसेच धोकादायक ठिकाणी वाहन थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यास म्हणजे काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल आणि प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर, तसेच इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टिंगलटवाळी, महिलांशी असभ्य वर्तन, अश्लील हावभाव, शेरेबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजेचा वापर करणे, गाडीतील स्पीकर, वूफरवर मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. धबधबे, धरणे आणि नदी आदी परिसरात दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ट्रेक करताना घ्यावयाची काळजी
ओळखीच्या आणि अनुभवी ग्रुपसमवेत ट्रेक करावा
ट्रेकमधील ट्रेकरची संख्या मर्यादित असावी
प्रथमोपचार साहित्यपेटी आवश्यक
चालताना रांगेत चालावे
स्थानिक वाटाड्याची मदत घ्यावी
पावसाचा अंदाज पाहून नियोजन करावे
निसरड्या जागा, पायऱ्यांवरून जपून चालावे
आपत्कालीन स्थितीमध्ये मोबाइल आवश्यक
अवघड ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्र घेणे टाळावे
पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीमध्ये उतरू नये
सुरक्षित, साहसी पर्यटन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, त्याचे पालन करणे अपेक्षित आहे. उमेश झिरपे, अध्यक्ष,अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ