पुणे : ‘कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिग आणि अस्वच्छता दिसते. या प्रकारामुळे पुणे शहराची वाटचाल स्वच्छ पुणे, सुंदर पुणेकडून अस्वच्छ पुणे, कुरूप पुणे, अशी सुरू आहे,’ अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.
याबाबत वेलणकर यांनी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये शहरातील कचरा प्रकल्पांची झालेली दयनीय अवस्था विशद करण्यात आली आहे. महापालिकेचा हडपसर भागातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा २०० टनांचा प्रकल्प गेले तीन आठवडे बंद आहे. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील धायरी येथील सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ५० टनांचा प्रकल्प देखील गेले एक महिना बंद आहे. सुस भागातील २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अर्ध्या क्षमतेने सुरू आहे.
‘वनाजजवळील जुन्या कचरा डेपोमधील रॅम्पची जागा दोन महिन्यांपूर्वी अचानक मेट्रोला देण्यात आली. यामुळे कोथरूड, वारजे, कर्वेनगर भागातील दिवसाकाठी गोळा केला जाणारा १२५ ट्रक कचरा वनाजऐवजी घोले रोड, कात्रज येथील रॅम्पवर पाठविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कचरा वाहतुकीचे अंतर तर वाढलेच पण त्या रॅम्पवरील ताण देखील वाढला आहे. कचरा घेऊन येणारे ट्रक खाली होण्यासाठी दुपटीने वेळ वाढला असून ट्रकच्या फेऱ्या मात्र निम्म्यावर आल्या आहेत. यामुळे शहरातील रस्त्यांवर आता कचरा साठून राहू लागला आहे. कोथरूड, वारजे, कर्वेनगर भागात कचऱ्याची ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल अस्वच्छ पुणे, कुरूप पुण्याकडे सुरू झाली आहे,’ असे वेलणकर म्हणाले.
‘पुणेकर नागरिक मिळकतकराच्या बिलांमध्ये २० टक्के सफाई कर भरूनही घरटी कचरा उचलण्यासाठी पैसे मोजतात. त्यामुळे स्वच्छ पुणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. फक्त स्वच्छ सर्वेक्षणापुरते दिखाऊ काम करून, भिंती रंगवून शहर स्वच्छ होत नाही,’ असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.