स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर या चार भारतरत्नांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आशा भोसले या आपापल्या क्षेत्रातील ‘उत्तुंग’ व्यक्तिमत्त्वांच्या खास आठवणी, त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि हजरजबाबीपणाचे गमतीशीर किस्से उलगडतच प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या ‘उत्तुंग’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम शुक्रवारी रंगला.
राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकाचे ‘भावार्थ’तर्फे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे आणि ‘भावार्थ’च्या कीर्ती जोशी या वेळी उपस्थित होत्या.
खरे म्हणाले, ‘मुलाखत हे चरित्र आणि आत्मचरित्राचा मिलाफ असते. सकृतदर्शनी सोप्या वाटणाऱ्या मुलाखतीसाठी शास्त्र, तंत्र, कला आणि कौशल्य आवश्यक असते. अबोल माणसाला बोलते करणे आणि खूप बोलणाऱ्या माणसाला थोपवून धरणे, या दोन्ही गोष्टींचे कसब गाडगीळ यांच्याकडे आहे.’
पवार म्हणाले,की इतक्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेताना गाडगीळ यांनी प्रत्येकाचा सखोल अभ्यास करून प्रश्न विचारले. या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातील बारकावे टिपण्यात ते यशस्वी झाले आहेत.
जोशी म्हणाले,की लेखणी आणि वाणी ही शब्दसृष्टीची दोन्ही अंगे सुधीर गाडगीळ यांना प्रसन्न आहेत. निवेदन या कलेचा इतिहास लिहिला गेला तर त्यात गाडगीळ यांचे मानाचे पान असेल.गाडगीळ म्हणाले,की बोलणे आणि बोलते करण्याचे काम गेली पन्नास वर्षे करतो आहे. या काळात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेता आल्या. त्या शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. पुढील पिढीसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल, असा प्रयत्न आहे.
डॉ. सदानंद बोरसे यांनी प्रास्ताविक केले. केतन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.