पुणे : जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले आणि स्मारके, धरण आणि अन्य पर्यटनस्थळाच्या ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार धरण, धबधबे, नद्यांच्या जलाशयात उतरण्यास मनाई करण्यात आली असून, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी हे आदेश लागू केले असून, ते ३१ ऑगस्टपर्यंत राहणार आहेत. लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे आणि पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढण्यास तसेच कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करण्याबरोबरच उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर तसेच इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजेचा वापर करणे, गाडीतील स्पीकर, वूफर मोठ्या आवाज वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यासही मनाई करण्यात आली आहे. धबधबे, धरणे आणि नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अनुमती असेल, असे डुडी यांनी या आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.