पुणे : ‘विभक्त कुटुंब पद्धती आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे माणसांचा एकमेकांबरोबरचा संवाद खुंटला आहे. संवादाच्या अभावाची ही पोकळी एकपात्री कलाकारच भरून काढू शकतो. त्यामुळे एकपात्री कला आणि कलाकारांना उज्ज्वल भविष्य आहे,’ असे मत पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केले.
मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणारे मधुकर टिल्लू यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या वतीने आयोजित विविध कला महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एकपात्री कलाकार परिषदेच्या उपाध्यक्ष मंजूषा जोशी, सचिव पल्लवी परब-भालेकर आणि प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू या वेळी उपस्थित होते. अंजली शहा यांना ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘एकपात्री कला क्षेत्रात टिल्लू कुटुंबाने घराणेशाहीचे उत्तम उदाहरण समाजासमोर निर्माण केले आहे,’ अशी टिप्पणी करून देसाई यांनी मधुकर टिल्लू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.