पुणे : ‘भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणोलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सहा धरणांच्या सांडव्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कळमोडी, वडीवळे, कासारसाई, खडकवासला, वीर आणि नाझरे धरणातून हा विसर्ग सुरू असून, जिल्ह्यातील अकरा धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत,’ अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

भीमा खोऱ्यात लहान-मोठी अशी एकूण २६ धरणे आहेत. यातील बहुतांश धरणे पुणे जिल्ह्यात आहे. जून महिन्यात या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अकरा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्गही सुरू करण्यात आला आहे. कळमोडी, वडीवळे, कासरसाई, खडकवासला, वीर आणि नाझरे धरणाच्या सांडव्यातून सध्या पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. घोड, भीमा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा आदी नद्या प्रवाही झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस कायम आहे. मात्र, त्याचा जोर काहीसा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३९ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७, पानशेत मध्ये नऊ मिलिमीटर तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शून्य मिलिमीटर पावासची नोंद झाली. या चारही धरणांमध्ये मिळून आजमितीस १२.१० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असून चारही धरणे ४३.४९ टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये मिळून ३.५३ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ८.५७ टीएमसी एवढा जास्त आहे. खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग कायम आहे.