पुणे : ‘थकलेल्या जीवाला शांत करण्याबरोबरच आयुष्य समृद्ध करण्याचे काम ललित कला करतात. एका अर्थाने ललित कला या माणसासाठी जगण्यासाठीचा ‘चार्जर’ आहेत,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
डॉ. विद्या गोखलेलिखित ‘संगीत रस सुरस’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ गायिका डॉ. सुधाताई पटवर्धन, ज्येष्ठ गायक डॉ. सत्यशील देशपांडे, प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले, अमृता सहस्रबुद्धे, दीपाली चौधरी, अमृता देसर्डा आदी या वेळी उपस्थित होते.
आगाशे म्हणाले, ‘लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य अशा विविध लोककलांचा उदय माणसाच्या आनंदासाठी झाला. कठीण वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी या सगळ्याच कला मदत करतात. मात्र, इतक्या महत्त्वाच्या असलेल्या या कलांकडे दुर्दैवाने अभ्यासेतर उपक्रम म्हणून पाहिले जाते. मुद्दाम जाऊन चित्र बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेणे या गोष्टीला शालेय शिक्षणात फारसे महत्त्व नसल्याने आपल्या संवेदना कशा जागृत होतील?’
‘ललित कलांच्या आस्वादातून सुसंस्कृत मन तयार होते. त्यातून मनाची मशागत होते,’ असे देशपांडे म्हणाले. पटवर्धन म्हणाल्या, ‘प्रत्येक कलेबद्दल स्वतंत्रपणे अनेक पुस्तके आहेत. पण, सगळ्या कलांचा एकत्रित आढावा घेणारे हे एकमेव पुस्तक आहे.’
‘ललित कलांचे कलांचे एकमेकांशी असलेले नाते’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ चित्रकार जयंत जोशी, ज्येष्ठ संगीत समीक्षक मुकुंद संगोराम, चित्रपट दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर, गायक डॉ. विकास कशाळकर, डॉ. माधुरी पोतनीस, बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. अभिजित नातू सहभागी झाले होते.
चिकाटी आणि जिद्द माणसाला कुठे नेते, याचे उदाहरण म्हणजे माझी आई विद्या गोखले. इतक्या वर्षांच्या संसारात आणि सगळ्यांचे करण्यात एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे तिचे गाणे आणि लिहिणे. हे पुस्तक त्याचेच रूप आहे. – मधुराणी गोखले, प्रसिद्ध अभिनेत्री