पुणे : शहरात काही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने नागरिकांना मदत व्हावी, यासाठी महापालिकेने अद्ययावत आपत्ती निवारण कक्ष उभारला आहे. हा कक्ष कार्यान्वित झाला असून, त्यामध्ये दोन हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील दृश्ये येथून दिसणार आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यामुळे शहरातील विविध भागांवर लक्ष ठेवता येणार असून, आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्वरित मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर हा आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत शहरात दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यावर या कक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात महापालिका तसेच पोलिस विभागाने बसविलेल्या २ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांचे नियंत्रण या कक्षातून ठेवता येणार आहे. मुंबई महापालिका, नागपूर या शहरांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने या कक्षाची उभारणी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात पडणाऱ्या पावसाचे स्वरुप बदललेले आहे. शहरातील काही भागात कमी वेळात अधिक पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीदेखील निर्माण होते. पावसाळ्यात दर वर्षी शहरात अनेक दुर्घटना घडत असतात. तसेच, इतर वेळेलाही अपघात, आग लागणे, इमारतीमध्ये नागरिक अडकून पडणे, घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचणे अशा घटना घडतात. यामध्ये वित्तहानी तसेच प्राणहानीदेखील होते. या बाबी टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारला आहे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरु करण्यात आलेला हा मुख्य कक्ष तसेच महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि त्यांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. शहरात संकटजन्य स्थिती आणि पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ७१ निवारा केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या कक्षाची जबाबदारी ही उपायुक्त संदीप खलाटे यांच्यावर असणार आहे.
चौकट
मदतीसाठी येथे करा संपर्क
आपत्ती निवारण कक्षातून मदत मिळवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक देखील महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत. ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८००, ०२०-६७८०१५०० या क्रमांकावर फोन करून नागरिकांना मदत मिळविता येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य सरकारच्या इतर विभागांशी तातडीने संपर्क साधून मदत घेता यावी, यासाठी विशेष क्रमांक (हॉट लाईन) देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.