पुणे : औंध येथील जैवविविधता उद्यानात (बॉटेनिकल गार्डन) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीचा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३० गुंठे जागेवरील जैवविविधता वारसास्थळाचे (बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट) आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, असा महापालिकेने अर्ज केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर येथे तातडीने काम करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
शहरातून वाहत असलेल्या मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत औंध येथील जैवविविधता उद्यानात महापालिकेने १० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या जागेवर जैवविविधता वारसास्थळाचे आरक्षण असल्याने महापालिकेला ही जागा ताब्यात घेण्यासाठी अडचण येत होती. गेल्या पाच वर्षांपासून महापालिका यासाठी पाठपुरावा करीत होती. पण, या परिसरातील ३२ हेक्टर जागेवर जैवविविधता वारसास्थळाचे आरक्षण होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. पर्यावरणाच्या अभ्यासासाठी ही जागा महत्त्वाची असल्याने या ठिकाणी काम करण्यास मान्यता देण्यासाठी कृषी विभागाने महापालिकेला नकार दिला होता.
यासाठी अनेकदा महापालिका आणि राज्य सरकार यांच्या पातळीवर बैठका झाल्या होत्या. पण, त्यावर तोडगा निघत नव्हता, त्यामुळे हे काम रखडले आहे. महापालिकेने यासाठी पाठपुरावा करून सांडपाणी प्रकल्पाचे काम पर्यावरण रक्षणासाठी आहे, असे पटवून दिले. त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने ही जागा सांडपाणी प्रकल्पासाठी महापालिकेला हस्तांतरण करण्यास काही हरकत नसल्याची भूमिका घेऊन ३० गुंठे जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची शिफारस केली, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. यामुळे येथे प्रकल्प उभारण्याचा महपालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.