एके काळी मुंबईत टोळीयुद्ध भडकलेले असताना त्याचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी ‘एन्काउंटर’ अस्त्राचा वापर केला. १९९० च्या दशकात हजारहून अधिक गुंड पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. पुणे शहर परिसरात गेल्या तीन दशकांत झालेल्या चकमकींत ३३ गुंड मारले गेले. पुण्यातील हडपसर भागातील गुंड टिपू पठाण टोळीतील सराईत शाहरूख शेख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत परवा, रविवारी मारला गेला. चकमकींत गुंड मारले गेल्याने टोळ्यांवर, गुंडांवर जरब बसते का, हा स्वतंत्र चर्चेचा विषय. पण, परवाच्या चकमकीनंतर पुण्यात झालेल्या किंवा पुण्याशी संबंधित असलेल्या चकमकींना यानिमित्त उजाळा देणे औचित्याचे ठरेल.

पुण्यातील पहिली चकमक लष्कर भागातील धोबी घाट परिसरात २२ मे १९८३ रोजी झाली. या चकमकीत राजू हिसामुद्दीन शेख या गुंडाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १७ मे १९९२ ला दांडेकर पूल परिसरात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय टेमघरे यांच्याशी झालेल्या चकमकीत सराईत गुंड जग्या म्हस्के ठार झाला. १९९० च्या दशकात मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांतील सराइतांचा वावर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वाढला होता. अरुण गवळी टोळीतील गुंड किरण वालावलकर आणि रवी करंजावकर हे कोंढव्यात झालेल्या चकमकीत मारले गेले होते. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोटे, दत्तात्रय टेमघरे यांनी केलेली ही कारवाई चर्चेत आली होती.

येरवड्यात दहशत असलेला गुंड मेघनाथ ऊर्फ बुधल्या शेट्टी हा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जोशी, अजित जोशी यांच्याशी झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दहशत निर्माण करणारा गुंड प्रमोद माळवदकर १९ नोव्हेंबर १९९७ रोजी पिंपरीतील काळेवाडीत झालेल्या चकमकीत मारला गेला. सुरेश टकले, खलील शेख, महंमद शेख, रोहिदास येवले, राॅबर्ट साळवे, राहुल कंधारे, मोबीन शेख, बाबा गंडले, संतोष ओव्हाळ, रमेश तिवारी, श्याम दाभाडे, धनंजय शिंदे, राकेश ढोकलिया ऊर्फ महाकाली हे गुंड गेल्या काही वर्षांत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले. या चकमकींच्या निमित्ताने तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक चांदगुडे, विनोद सातव, दत्तात्रय टेमघरे, राजेंद्र जोशी, अजित जोशी, राम जाधव, बापू कुतवळ, सतीश गोवेकर, मिलिंद गायकवाड आणि त्यांची पथके चर्चेत आली होती.

कल्याणमधील गुंड सुरेश मंचेकर टोळीतील विश्वनाथ कामत, गोपाळ नायडू, सखाराम कोलेकर, छोटा राजन टोळीतील गुंड दिलीप गोसावी हे गुंड पुणे पोलिसांशी उडालेल्या चकमकीत मारले गेले होते. अंगडियांना लुटणारा सदाशिव शेट्टी चांदणी चौक परिसरात चकमकीत मारला गेला होता. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गेल्या काही वर्षांत संघटित गुन्हेगारी टोळ्या नावारूपाला आल्या. मुंबईतील टोळीयुद्ध शमले असतानाच पुण्यात टोळीयुद्धाने डोके वर काढले. जमीन व्यवहारांत गुंड टोळ्या हस्तक्षेप करू लागल्या. बेकायदारीत्या जमिनी बळकाविणे, जमिनींवरील वसाहत हटवून त्या मोकळ्या करून देणे अशा प्रकारचे उद्योग गुंड टोळ्यांनी सुरू केले. त्यांना बांधकाम व्यावसायिकांकडून आर्थिक रसद पुरविण्यात आली. टोळ्यांचे म्होरके, त्यांचे राहणीमान पाहून अनेक तरुण टोळ्यांत सामील झाले. वर्चस्वाच्या वादातून मुळशी, कोथरूड, मावळ, कोंढवा, बिबवेवाडी भागातील गुंड टोळ्यांमध्ये संघर्ष उडाला.

पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांंनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. पण, त्यावर विविध उपाय योजून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न झाले. दरम्यानच्या काळात चकमकींबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही स्पष्ट निर्देश दिले. चकमकीनंतर मानवी हक्क आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतींवर प्रश्न उपस्थित केले, तसेच नातेवाइकांकडूनही आरोप केले. या पार्श्वभूमीवर अशा घटनाही कमी झाल्या. मग गुंडांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) टोळ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. ‘मकोका’, झाेपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. अशा कारवायांमुळे गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांसह साथीदारांना कारागृहातून जामीन मिळवून लवकर बाहेर पडणे अशक्य झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर शहर परिसरात किरकोळ वादातून वाहन तोडफोड, गाड्या पेटवून देणे, खून, खुनाचा प्रयत्न, तसेच दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गुंड टोळ्यांचे म्होरके कारागृहात असले, तरी या टोळ्यांसाठी अनेक अल्पवयीन, तसेच तरुण काम करत आहेत. म्होरक्याप्रमाणे समाजात प्रभाव पडावा आणि आपली दहशत निर्माण व्हावी, यासाठी अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. वाढत्या शहरातील वाढत्या गुन्हेगारीची ही आव्हाने कशी पेलायची, हा खरा आता प्रश्न आहे.rahul.khaladkar@expressindia.com