पुणे : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेनंतर भारतीय सैन्यानी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केली. त्या दरम्यानच्या कालावधीत विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित करीत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी थांबत नाहीत तोवर पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तान संघर्षा दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली, पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली, या बाबतचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी केली.
ते पुढे म्हणाले, राजकीय पक्षांनी भारत पाकिस्तान संघर्षावर उघडपणे बोलले पाहिजे. सरकारच्या कुचकामी भूमिकेला प्रश्न केला पाहिजे. देशाची सुरक्षा फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर जनतेची आहे. जनतेने यात सहभाग घ्यावा आणि यावर सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर फिरले, पण भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान एकही देश उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही.याची कारणे पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत.
रशिया हा भारताचा जुना मित्र आहे, भारताकडे रशियाची अनेक संरक्षण साहित्य आहेत. तर भारत पाकिस्तान संघर्ष संपल्यावर रशियाने पाकिस्तानला मदत केली आहे. ज्याप्रमाणे १९७१ च्या युद्धा दरम्यान रशिया उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला होता. त्याप्रमाणे आताच्या भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान तो उभा राहिला नाही.ज्या फ्रांस देशाकडून आपण राफेलसारखी एवढी विमाने घेतली, तोही भारताच्या बाजूने उभा राहिला नाही.
तसेच पाकिस्तानकडे १० दिवस पुरेल एवढाच दारुगोळा होता. तो दारुगोळा संपला असता, तर भारताला पाकिस्तानवर पाहिजे ती अट घालता आली असती, पण आपल्या नेतृत्वाने कच खाल्ली आणि आपण जिंकलेली लढाई हरलो.त्यामुळे आरएसएसवाल्यांना आम्ही विचारतोय की, तुम्ही प्रत्येकवेळी पाकिस्तान विरोधात का हारताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.