पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवाडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे.

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रीणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मोटारचालक मुलगा मित्रांसोबत पार्टी करून कल्याणीनगर भागातून निघाला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मध्यरात्री वाहतुकीचे नियम धुडकावून भरधाव वेगाने वाहन चालविणारे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.

हेही वाचा…पुणे अपघातातील राजकीय वादात वसंत मोरेंची एन्ट्री; स्थानिक पुढाऱ्यांना इशारा देत म्हणाले, “हिंसक आंदोलन झालं तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या भागात कारवाई करून १२५५ वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ८५ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, बाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. येरवडा, विमाननगर, चतु:शृंगी, मुंढवा, कोरेगाव पार्कसह वेगवेगळ्या भागात ही कारवाई करण्यात आली. मुंढवा आणि सहकारनगर भागात वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.