पुणे : जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा करण्यात आला आहे. नगरपरिषदांचा आराखडा नगरविकास विभागाकडे तर, नगरपंचायतींचा आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. या दोन्हींवर येत्या २१ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील.
दरम्यान, आराखड्यानुसार जिल्ह्यातील बारामती आणि फुरसुंगी या दोन नगरपरिषदांमध्ये अनुक्रमे ४१ आणि ३२ इतकी सर्वाधिक सदस्यसंख्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींनी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.
आराखडा पूर्ण झाल्यानंतर तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाकडून त्याची छाननी करण्यात आली. त्यानंतर मंचर, माळेगाव आणि वडगाव मावळ या तीन नगरपंचायतींचा प्रारूप आराखडा हा विभागीय आय़ुक्तालयात पाठविण्यात आला आहे. तर बारामती, तळेगाव, लोणावळा, चाकण, दौंड, फुरसुंगी, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, जुन्नर, आळंदी, शिरूर आणि राजगुरूनगर या चौदा नगरपरिषदांचा प्रारूप आराखडा मान्यतेसाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रारूप आराखड्याबाबत १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर २२ ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान नगरपरिषदांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल. तसेच नगरपंचायतीच्या हरकतीवर २२ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होईल. त्यानंतर २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानंतर तो त्यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. नगरपरिषदांसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आयोगाकडून पुन्हा हा आराखडा विभागीय आय़ुक्तांकडे पाठविला जाईल. देहू नगरपंचायतीची निवडणूक होणार नाही. तर फुरसुंगी नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरपंचायतीमध्ये एकचा प्रभाग
जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत आहे. तर चौदा पैकी बहुतांश नगरपरिषदांमध्ये द्विसदस्य प्रभाग पद्धती आहे. जिल्ह्यात बारामतीत ४१, लोणावळा २७, चाकणमध्ये २५, आळंदी, राजगुरुनगरमध्ये प्रत्येकी २१ सदस्य संख्या आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकी एक प्रभाग त्रिसदस्य संख्येचा आहे. माळेगाव, मंचर, वडगाव मावळ या तीन नगरपंचायतीच्या सदस्य संख्या १७ इतकी आहे. तेथे एक प्रभाग पद्धतीने निवडणूक होईल.