पुणे : ‘पाण्याची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या पुण्याला चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आगामी १५-२० वर्षांत पुण्यालाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराच्या विविध भागांत सुमारे तीन हजार टँकरनी पाणीपुरवठा केला जातो. त्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढेल,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले. वाढत्या मागणीच्या तुलनेत नैसर्गिक पाणीसाठा अपुरा पडत असल्याने जलसंवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गंगोत्री होम्स’च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या मेधा ताडपत्रीकर यांना ‘गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार,’ तर अनिकेत लोहिया यांना ‘गंगोत्री होम्स जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी जावडेकर बोलत होते. ‘गंगोत्री होम्स’चे संचालक राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात पुरस्कार निवड समितीचे सदस्य आनंद अवधानी, पूर्वा केसकर, संदीप सोनिग्रा यांना सन्मानित करण्यात आले.
जावडेकर म्हणाले, ‘वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्याही निर्माण होत आहेत. पाण्याचा वापर कमी करून पाणीसाठे वाढवण्याला प्राध्यान्य द्यायला हवे. आता ‘पाणी वाचवा आणि पाणी वाढवा’ हा मूलमंत्र घेऊन काम करावे लागणार आहे. देवराईसारख्या परंपरा असलेल्या या देशाची मूळ जीवनशैली पर्यावरणाला पूरक अशीच आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
‘रुद्र’ या संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक प्रश्नावर काम करणाऱ्या ताडपत्रीकर म्हणाल्या,‘निसर्गाला आपली गरज नाही. आपल्याला निसर्गाची गरज आहे, हे ओळखून काम करायला हवे. एकट्याने केल्याने काय होणार, असे न मानता माझ्या कामातून काय बदल घडवता येईल, त्याचा विचार करायला हवा.’
‘मानवलोक’ या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर काम करणारे लोहिया म्हणाले, ‘गेल्या २५ दिवसांपासून चांगला पाऊस आहे. मात्र, आजही अंबाजोगाई, बीडमध्ये पिण्याचे पाणी १५ दिवसांनी मिळते. मराठवाड्यातील पाणी समस्येमुळे स्थलांतराची समस्या निर्माण झाली. आता वृद्ध, स्त्रिया आणि बालकांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.’
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. केळकर यांनी आभार मानले.
सध्या प्लास्टिकपेक्षाही वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन, वर्गीकरण न होणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. इमारतींसाठी पर्यावरणाचे नियम आणखी कडक करायला हवेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधता येतो. त्यासाठी पर्यारणप्रेमींनीही टोकाची भूमिका न घेता उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. – प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री.