जेजुरी : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी रथातील पादुकांना आज पवित्र नीरा नदीत स्नान घालण्यात आले. स्नानानंतर पालखी सोहळ्याने दुपारी तीन वाजता पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सातारा हद्दीत प्रवेश केला.
दुपारी दोन वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात दत्त मंदिर घाटाजवळ नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले. सकाळी सहा वाजता महर्षी वाल्मीकीच्या वाल्हे गावातून पालखी सोहळ्याने लोणंदला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. विठू नामाचा गजर करीत पालखी सोहळा दुपारी साडेअकरा वाजता नीरा शिवतक्रार येथे पोहोचला. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी स्वागत केले. दुपारी अडीच वाजता भोजन आणि विश्रांती झाल्यावर पालखी सोहळा नीरा स्नानासाठी निघाला.
हैबतबाबांचे वंशज राजेंद्र आरफळकर यांनी माउलींच्या चांदीच्या पादुका हातात घेतल्या, त्यांच्या समवेत पालखी सोहळाप्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांना दत्त घाटावर विधियुक्त स्नान घालण्यात आले.
पादुका रथामध्ये ठेवल्यावर पूजा झाली. त्यानंतर पालखी रथ पूल ओलांडून सातारा हद्दीजवळ आला. या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीने या सोहळ्याला निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा चार दिवस मुक्काम होता. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. संत सोपानदेवांच्या सासवड नगरीत दोन दिवस, जेजुरी आणि वाल्हे येथे प्रत्येकी एक दिवस हा सोहळा मुक्कामी होता. शुक्रवारी माउलींचा मुक्काम लोणंद येथे आहे.