इंदापूर: ‘उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध कारखाने आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे उजनीचे पाणी दूषित झाले आहे. त्याविरोधात लढा देण्यासाठी उजनी काठ, सोलापूर आणि परिसरातील नागरिकांनी एकत्रित यावे. ही लढाई भविष्यातील पिढीसाठी आहे. त्यामध्ये ग्रामस्थांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केली.
राजेंद्रसिंह यांनी उजनी पाणलोट क्षेत्राला विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला जल बिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, तेलंगणाचे माजी मंत्री व्ही. प्रकाशराव, आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी, रमाकांत कुलकर्णी, शिवदास सूर्यवंशी, सुनील रहाणे, आकांक्षा पांडे; तसेच भजनदास पवार, मारुती वणवे, हनुमंत बंडगर, सरपंच गुराप्पा पवार, सचिन बोगावत, ॲड. पांडुरंग जगताप, संपत बंडगर, बाबा धवडे, संतोष सवाणे, सीमा काळंगे, सखाराम खोत आदी उपस्थित होते.
राजेंद्रसिंह म्हणाले, ‘उजनीतील परिसर हा रासायनिक पदार्थांमुळे दूषित झाला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडमधील रसायनमिश्रित पाणी, मलमूत्र उजनीमध्ये येते. नागरिक त्या पाण्यामुळे आजारी पडत आहेत. पुण्यातील नागरिकांना तीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी मिळत असल्याचे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत. उजनीच्या परिसरात २० लिटरला २० रुपये मोजावे लागत आहेत. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे.’
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे वर्षाला सुमारे २० दशलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी वापरतात. हे पाणी उजनीतील ११७ टीएमसी पाण्याला विषारी बनवत असेल तर, हा कसला विकास? हा तर विनाश आहे.’ अशी टीका त्यांनी केली.