बारामती : ‘शेतीपुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. बारामतीतून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या क्रांतीची सुरुवात होत आहे. हे तंत्रज्ञान थोडे खर्चिक असले, तरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर कारखाने खर्चाचा भार उचलणार आहेत. यापुढील काळात ‘एआय’चा कृषी क्षेत्रातील वापर वाढवणे गरजेचे आहे.’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, अटल इनक्युबेशन सेंटर, आयआयटी मुंबई, विद्या प्रतिष्ठान आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सेंटर, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन शरद पवार यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यशाळेला खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आयआयटी मुंबईचे नरेंद्र शहा, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे अनंत कल्याणरामण, मायक्रोसाॅफ्टच्या सपना नोरिया, डाॅ. सुनील कदम, लव खोत, विश्वस्त रजनी इंदुलकर, विष्णूपंत हिंगणे, डाॅ. अविनाश बारवकर, राजीव देशपांडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘एआय तंत्रज्ञानासाठी पहिल्या वर्षी हेक्टरी २५ हजारांचा खर्च येणार आहे. त्यापैकी शेतकऱ्याला नऊ हजार रुपये भरायचे आहेत. उर्वरित रक्कम वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट आणि संबंधित कारखाना भरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी काही दिवसांतच नऊ हजार शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, नेदरलँड्स यांसारख्या देशांनी; तसेच तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांनी बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रयोगांबाबत उत्सुकता दर्शविली आहे. नवीन क्रांतीची सुरवात बारामतीतून होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे.’
‘एआय’मुळे क्रांतिकारी बदल
‘शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. लागवड काळ, सुपीकता, पाण्याचा अतिवापर, कीड आणि रोगाचा वाढता वापर, मातीचा पोत कमी होतो आहे. तोडणीचा काळ ठरवायला अडचणी येत आहेत. उत्पादन खर्च निघेनासा झाला आहे. निसर्गावर आधारित शेती असून, हवामान अंदाजाचा अभाव आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी बारामतीत ‘एआय’आधारित ऊस शेती प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यामुळे क्रांतिकारी बदल होतील. येथील प्रयोगात उत्पादन खर्च २५ टक्के घटला, पाण्याचा आणि खताचा वापर ४० टक्के कमी झाला. इथेनॉलमध्ये एकरी ९१० लिटर वाढ झाली.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.