पुणे : ‘ठाकरे बंधूंचे राजकारण संपविण्यासाठीच हिंदीचे करण्यात येत असून, इथल्या प्रादेशिक पक्षांनाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे,’ अशी टीका साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी केली. ‘सध्याच्या काळात राजकीय संस्कृतीचे टोकाचे अधःपतन झालेले दिसते. मात्र, ही परिस्थिती बदलण्याचे काम भारतीय मतदारांचे आहे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘मैत्र संघा’च्या वतीने साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सुरेखा खरे यांना ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, कार्यक्रमाचे संयोजक मनोहर कोलते, ललिता सबनीस, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य या वेळी उपस्थितीत होत्या.
सबनीस म्हणाले, ‘सत्य साधण्यासाठी सत्ता असते. मात्र, सध्या सत्ता हीच साध्य झाली आहे. भ्रष्टाचाराला मर्यादा राहिली नाही. नेत्यांची संकल्पना विकृत वर्तुळात बंदिस्त झाली आहे,’ असे सांगून सबनीस म्हणाले, ‘गरिबांच्या कळवळ्याशिवाय समाजवाद शक्य नाही. मार्क्सवाद संपला, नक्षलवाद संपेल. मात्र, समाजवाद या देशातून कधीही संपणार नाही. लोकशाही समाजवाद हा ‘भाईं’च्या कामाचा ध्यास होता. त्यांनी जीवनाचा प्रत्येक क्षण लोकशाही समाजवादासाठी खर्च केला. त्यांच्यासारखा तपस्वी, ज्ञानी, समाजकारणी आणि धोरणी माणूस दुसरा सापडणार नाही. समाजवादाचा खरा अर्थ सामाजिक बांधिलकीतून साधणारे भाई एकमेव नेते होते.’
‘सध्या थेट अणीबाणी घोषित न करता, आपण आणीबाणीचाच काळ अनुभवत आहोत. ‘भाईं’वर भाबडे प्रेम करणाऱ्या माणसाला पुरस्कार देऊन चालणार नाही. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या माणसांना प्रोत्साहन द्यायला हवे,’ अशी भावना डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली. प्रा. भागवत थेटे यांनी सूत्रसंचालन केले. कोलते यांनी आभार मानले.