पुणे : वर्षभरात शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या दुर्घटनांत विजेच्या धक्क्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नाना पेठेत एका फलकाच्या खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरात झालेल्या दुर्घटनांचा आढावा घेतला असता, त्यात ही माहिती मिळाली.

गेल्या वर्षी २५ जुलै रोजी शहरात पाऊस झाला. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. नदीपात्रातील पाणी डेक्कन जिमखाना परिसरातील चौपाटी परिसरात शिरले हाेते. त्या वेळी पाण्यात बुडालेली खाद्यपदार्थाची गाडी काढण्यासाठी गेलेल्या अभिषेक अजय घाणेकर (वय २५), आकाश विनायक माने (वय २१, दोघेही रा. पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना) आणि नेपाळी कामगार शिवा जिदबहादूर परिहार (वय १८) तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास गाडी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी ते गेले होते. त्या वेळी विजेचा धक्का त्यांना बसला होता.

गेल्या वर्षी पावसाळ्यात हडपसर भागात साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरला होता. त्या पाण्यातून जाणाऱ्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. औंध परिसरातील ब्रेमेन चौकात एका खासगी कंपनीत सफाई काम करणाऱ्या महिलेचा वीजप्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. ब्रेमेन चौकातील कोपऱ्यावर पाणी साचले होते. त्या पाण्यातून जात असताना विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पेठेत खांबात उतरलेल्या विद्युतप्रवाहाच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू अशी केली होती. या प्रकरणात महावितरणकडून तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. अहवालाचे अवलोकन करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.- उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे</strong>