पुणे : राज्य मंडळातर्फे राज्यातील बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होत आहे. एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. विद्नान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३८ हजार २२६, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा…पुणे : नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोसावी म्हणाले, परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. यंदा पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल़्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिव्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.