पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयादीत नव्याने कोणाचेही नाव समाविष्ट होणार नसले, तरी दुबार नावे,मृत मतदारांची नोंद वगळण्याबरोबरच यादीतील चुका टाळण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. निवडणुकीची अंतिम मतदारयादी महापालिका प्रशासनाला २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करावी लागणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक साडेतीन-चार वर्षांपासून रखडलेली आहे. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने संपूर्ण कारभार लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासनाच्या हाती आला आहे. निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती; तरी निर्णय होत नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तातडीने घेण्याचा आदेश दिल्याने ही रखडलेली निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने वेगाने सुरू केली आहे.

आयोगाने केलेल्या सूचनांनुसार, महापालिका आयुक्तांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी स्थानिक वृत्तपत्र, महापालिका व प्रभाग समिती कार्यालयांचे सूचनाफलक, महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मतदारयादीचा वापर न करता निवडणूक आयोगाने दिलेली मतदारयादी वापरावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची विधानसभानिहाय मतदारयादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या मतदारयादीमध्ये नव्याने नावे नोंदली जाणार नाहीत. केवळ तांत्रिक चुका दुरुस्त करून ती अंतिम केली जाणार आहे. आयोगाने मतदारयादी महापालिका प्रशासनाला पाठविली आहे. तिचे प्रभागनिहाय विभाजन करून प्रारूप मतदारयादी तयार केली जाणार आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ६ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे.

महापालिका प्रशासनाला २८ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी आणि ४ डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी जाहीर करावी लागणार आहे. तर, १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रकाशित करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. पुणे महापालिकेसह सर्व महापालिकांना मतदारयादी तयार करताना दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदारांची नोंद वगळण्याच्या, तसेच यादीतील चुका टाळण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.या कार्यक्रमामुळे पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक तयारीची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली असून, डिसेंबरअखेरपर्यंत ती पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नावे नसल्यास हरकत नोंदविता येणार

महापालिका आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाची यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींनुसार केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून वेगळ्या प्रभागात गेले असतील, विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या यादीतून नावे गायब झाली असल्यास ती प्रभागाच्या यादीत समाविष्ट करता येणार आहेत.

हरकती-सूचनांवर योग्य सुधारणा

मतदारयादीत मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती प्राप्त झाल्यास त्याची नोंद मार्क कॉपीमध्ये करण्यात येणार आहे. या मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांवर आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने निर्णय घेऊन योग्य त्या सुधारणा मतदारयादीत करायच्या आहेत, असे निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.