पुणे : राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली असून, १४ जूनपर्यंत ४ हजार ४७१ हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे २ हजार ३१ आणि चिकुनगुनियाचे ९०० रुग्ण आहेत. हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून, पुणे जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षी याच काळात हिवतापाची रुग्णसंख्या ३ हजार ९५४ होती आणि ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत या वर्षी रुग्णसंख्येत सुमारे एक हजारांची वाढ झालेली आहे. हिवतापाचे सर्वाधिक २ हजार ३१४ रुग्ण मुंबईत आहेत. त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात १ हजार १८०, पनवेलमध्ये २१६, रायगड जिल्ह्यात २११, गोंदिया जिल्ह्यात २८ अशी आकडेवारी आहे.
गेल्या वर्षी डेंग्यूचे याच कालावधीत ३ हजार १७३ रुग्ण आढळले होते आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यात तुलनेत रुग्णसंख्येत यंदा घट आहे. सर्वाधिक ३९५ रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत आहेत. त्याखालोखाल अकोला (१३९), पालघर जिल्हा (१३३), नाशिक महापालिका (१३२), पुणे जिल्हा (१२८), अकोला जिल्हा (११९) अशी रुग्णसंख्या आहे. चिकुनगुनियाचे गेल्या वर्षी याच काळात ७९४ रुग्ण होते. यंदा त्यात वाढ झाली असून, सर्वाधिक ११९ रुग्ण मुंबई महापालिकेत आहेत. त्या खालोखाल पुणे जिल्हा (१०४), अकोला महापालिका (१०१), अकोला जिल्हा (८५) आणि पालघर (६९) अशी रुग्णसंख्या आहे.
आरोग्य विभागाकडून उपाययोजना
रुग्ण आढळलेल्या परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण
तापरुग्णांची कीटकजन्य आजारांसाठी तपासणी
डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी पावले
रायगड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांतील ११८० गावांत औषध फवारणी
गडचिरोली, मुंबईत हिवताप नियंत्रणांसाठी विशेष मोहीम
प्रत्येक जिल्ह्यात जलद प्रतिसाद पथक कार्यान्वित
जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुंबईत हिवताप नियंत्रणासाठी कार्यशाळा
राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
असा आहे साथरोगांचा प्रादुर्भाव…
हिवताप : ४४७१
डेंग्यू : २०३१
चिकुनगुनिया : ९००
पावसाळ्यात साथरोगांचा प्रादुर्भाव दर वर्षी वाढतो. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या आठड्यातच बैठक घेऊन साथरोग नियंत्रणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. संदीप सांगळे सहसंचालक, आरोग्य विभाग