पुणे : विदर्भासह राज्याच्या अन्य भागांत असलेले ढगाळ वातावरण निवळले आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहून उन्हाच्या झळा वाढण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात किरकोळ, तर कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबाची रेषा ईशान्य उत्तर प्रदेशापासून पूर्व विदर्भापर्यंत आहे. एक पश्चिमी थंड वाऱ्याचा झंझावात देशाच्या पश्चिम सीमेवर सक्रिय आहे. थंड वाऱ्याच्या झंझावाताचा राज्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. विदर्भात असलेले ढगाळ हवामान निवळले असून, विदर्भासह पुढील चार-पाच दिवस राज्यभरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>‘शिरूर’मधून आढळराव पाटील ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार; दिल्ली दौऱ्यानंतर अधिकृत घोषणेची अजित पवार यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी राज्यात सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअसची नोंद सोलापुरात झाली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे सरासरी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर होते. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३५ अंशांवर होते. सांताक्रुज येथे ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.