लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणासाठी महापालिका आणि लोकसहभागातून एकूण १२५ वॉर्डन नियुक्त करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन हवेतच राहिले आहे. या रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत असताना वाहतूक नियंत्रणासाठी केवळ ५० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुळातच धोकादायक असलेल्या या रस्त्याच्या समस्या कायम राहिल्या आहेत.
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम आणि सातत्याने होत असलेल्या लहान-मोठ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याची पाहणी करत कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी सततच्या लहान-मोठ्या अपघातांमुळे चर्चेत असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून १०० आणि लोकसहभागातून २५ असे एकूण १२५ वॉर्डन नियुक्त करण्याची घोषणा पाटील यांनी केली होती. या घोषणेनंतर वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र घोषणा करून दहा दिवस झाले तरी वॉर्डन नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-‘बीआरटी’चा अट्टाहास! वाकडेवाडी ते बोपोडी नवीन मार्गासाठी भूसंपादन; ८५ कोटी रुपयांची उधळपट्टी
गेल्या चार दिवसांत या रस्त्यावर दोन अपघात झाले आहे. यापूर्वीही सातत्याने लहान-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जागा मिळत नसल्याने आधीच रस्त्याची कामे रखडली आहेत. त्यातच अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी वॉर्डनची नियुक्ती आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे वॉर्डनची नियुक्ती कधी केली जाणार, असा प्रश्नही नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.