राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने या निर्णयास विरोध दर्शवत राज्य सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून दानवे यांनी टोला देखील लगावल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “खरंतर या राज्य सरकारमध्ये काय चाललंय? ना तर या सरकारमध्ये असलेल्यांना कळत, ना ते जनतेला कळत. आमच्या काळात काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. जसा की चंद्रपूर जिल्हा, त्या ठिकाणी आम्ही दारूबंदी केली होती, लोकांची मागणी होती. मात्र हे सरकार आलं त्यांनी पुन्हा चंद्रपूरला दारू सुरू केली आणि केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात पानटपरीवर देखील हे वाईन विकायला लागले आहेत. आज वाईन विकायला लागले आहेत, उद्या बिअर विकतील आणि पुन्हा दारू विकायला लागतील. मला असं वाटतं की सरकारला जर उत्पन्न पाहिजे असेल, तर अनेक रस्ते मोकळे आहेत सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी. दारू टपरीवर किंवा एखाद्या दुकानावर विकून पैसा उभा करणं हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही. अन्य राज्यात काही असो परंतु महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे.”

काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाइन पितात : अजित पवार

तसेच, “अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही. पण वाईन आणि दारू मधला फरक… अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही. उद्या ते असंही म्हणतील की महिलांनीही प्यायली तरी चालेल, असं नाही होणार. मला असं वाटतं की याचं समर्थन कोणीही करू शकत नाही.”

…राज्य सरकारला एक चपराक आहे –

याचबरोबर, भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या निर्णयावरूनही रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालायने जो निर्णय दिला, तो या राज्य सरकारला एक चपराक आहे. असे मनमानी पद्धीतने घटनाबाह्य निर्णय घेण्याचे अधिकार या राज्य सरकारला नाही आणि जे काही दिल्लीतील खासदारांचं निलंबन केलं गेलं आहे ते काही वर्षभरासाठी केलं गेलेलं नाही.” असं दानवे यांनी बोलून दाखवलं.

राज्य सरकारडे आमचे अजुनही पैसे आहेत –

याशिवाय राज्याचे जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडे थकीत असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात असून, यावरून केंद्रावर टीका केली जात आहे. राज्य सरकारच्या या टीकेला उत्तर देताना केंद्रीयमंत्री दानवे यांनी सांगितले की, “हिशोबच जर काढला तर राज्य सरकारडे आमचे अजुनही पैसे आहेत. मी कोळसामंत्री आहे, ३ हजार कोटी रुपये कोळशाचे आहेत. परंतु आम्ही असं कधी म्हणालो नाही आणि तुमच्याकडे पैसे बाकी आहेत म्हणून आम्ही कोळसा कधी थांबवला नाही. केंद्राने राज्याला काय मदत केली आणि राज्याचे केंद्राकडे किती प्रलंबित आहेत, याचा हिशोब जर काढला तर राज्याची पंचाईत होईल. असं नाही की आपल्या महाराष्ट्रालाच दिले नाहीत, राज्य सरकारचे जीएसटीचे पैसे देण्याची जी पद्धत आहे, त्यानुसार समप्रमाणात सगळ्या राज्यांना रक्कम दिली जाते.”

“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक…”, अजित पवारांचा विरोधकांना टोला!

काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार –

“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister raosaheb danve criticizes ajit pawar and the state government msr 87 svk
First published on: 29-01-2022 at 15:34 IST