पिंपरी : पुणे, शिरुरमध्ये उमेदवार दिल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघामध्येही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले. मागील निवडणुकीत लाखभर मते घेणाऱ्या वंचितच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात मावळ लोकसभा मतदारसंघ विस्तारला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मावळवर तीन वेळा शिवसेनेचे वर्चस्व राहिले. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती. आता राजकीय परिस्थिती बदलली असून दोन्ही शिवसेनेतच लढत होणार आहे.

हेही वाचा…अजित पवारांनी आधी सांगूनही पुणेकरांचे अखेर ‘एप्रिल फूल’! जाणून घ्या नेमके प्रकरण…

महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. मावळमध्ये दुरंगी लढत होईल असे वाटत असतानाच आता वंचितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून चूरस निर्माण होईल असे दिसते.

संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितला मानणारा लाखभर मतदार आहे. मागीलवेळी घाटाखालील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील यांनी वंचिकडून निवडणूक लढविली होती. पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची ७५ हजार ९०४ मते मिळवित लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे १७,२०९ आणि १७,७९४ मते घेतली. त्या खालोखाल पनवेलमध्ये १५,९२६ आणि मावळमध्ये ११,७३१ मते मिळविता आली. उरण आणि कर्जतमध्ये त्यांना दहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती. पाटील यांनी प्रचार केला नव्हता. तरी, देखील ७६ हजार मते मिळाली होती. मावळमध्ये वंचितला मानणारा मोठा मतदार असून ताकदीचा उमेदवार देणार असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले.

हेही वाचा…खडकी दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करा – उच्च न्यायालय

‘वंचित’चा कोणाला बसणार फटका?

मावळमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. वंचितला मानणारा मतदार हा आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी होता. आता वंचितचा उमेदवार निवडणूक रिंगणात येणार असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीकडून लढत असलेल्या ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांना बसू शकतो, असे बोलले जात आहे.

हेही वाचा…मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

मावळमधून लढण्यासाठी सात ते आठ जण इच्छुक आहेत. दोन दिवसात ताकदीचा उमेदवार जाहीर करण्यात येईल. मी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.